दक्षिण गडचिरोलीत जोरदार पाऊस ; ४४० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
आलापल्लीत ढगफुटी, ३२५ मिमी पावसाची नोंद
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १२ जुलै
मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक नदीनाले ओसंडून वाहत असून, दुर्गम भागातील काही नाल्यांच्या पुलांवरून पाणी वाहत आहे. मंगळवारी सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अहेरी तालुक्यातील आलापल्ली महसूल मंडळात तब्बल ३२५ मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली.
दक्षिण गडचिरोलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षी जुलैमध्ये जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यात १ जून पासून आत्तापर्यंत अपेक्षित पावसाच्या १४६ टक्के म्हणजेच ५५१ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ५७.५ मिमी पाऊस झाला. तर अहेरी तालुक्यात सर्वाधिक २०९.४ मिमी पाऊस पडला.
हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यात ११ ते १३ जुलैदरम्यान रेड अलर्ट जाहीर केला आहे. हा अंदाज खरा ठरत रात्रीपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत होता, अगोदरच ओसंडून वाहणाऱ्या नदीनाल्यांच्या पातळीत पुन्हा वाढ झाली असून भामरागड आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. तर सिरोंचा तालुक्यातील बोरमपल्ली ते नेमडा, कंबालपेठा ते टेकडा चेक आणि पर्सेवाडा-चिकेला- जाफराबाद येथील नाल्यावरील रपटे वाहून गेल्याने सदर मार्ग पूर्णतः बंद आहेत. तसेच गडचिरोली तालुक्यातील कुंभी ते चांदाळा, माडेमुल-रानमूल-चांदाळा, अहेरी तालुक्यातील लगाम ते आलापल्ली, देवलमारी ते अहेरी आणि धानोरा तालुक्यातील पेंढरी ते बोटेहुर मार्ग नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाले. अहेरीतील मुसळधार पावसामुळे दिना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे, बोरी आलापल्ली मुक्तापूर येथे रस्ता खचल्याने वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. भामरागड तालुक्यात दूरसंचार सुविधा ठप्प पडली आहे.
संजय सरोवर, गोसेखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. गोदावरी, प्राणहिता व वर्धा नदीसुद्धा उफाळून वाहत आहे. मोठ्या नद्या उफाळून वाहत असल्याने या नद्यांना लागून असलेल्या लहान नद्या व नाल्यांना दाब निर्माण झाला आहे.
नवजात चिमुकल्यासह ८७ लोकांना एसडीआरएफ चमूने सुखरूप बाहेर काढले
सोमवारी रात्रीपासून अहेरी तालुक्यातील आलापल्ली महसूल मंडळात तब्बल ३२५ मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली. नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळताच तात्काळ एसडीआरएफ टीमला घटनास्थळी बोलविले. यादरम्यान २५ नागरिकांना स्थानिक युवकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. जिल्हा प्रशासन, पोलीस व एसडीआरएफ टीमने बचावकार्य राबवून नागेपल्ली मधील १७ नागरिकांना बोटीने बाहेर काढले. यात एका नवजात चिमुकल्याचाही समावेश होता. तसेच इतर मार्गाने ४५ असे एकूण ८७ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
सिरोंचा तालुक्यातील १२ गावे खाली करण्याचे आवाहन
जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असून गोदावरी व प्राणहिता नदीमधील वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा रै, सूर्यरापल्ली, मंडलापूर, मद्दिकुंठा, जानमपल्ली, मृदुक्रिष्णापुर, आयपेठा रै, सोमनूर माल, नडिकूडा, कोत्तूर रै, असरअल्ली, अंकिसा कंबाल पेठा टोला या १२ गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी तातडीने गाव खाली करून सुरक्षित स्थळी जाण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.