महा सांस्कृतिक महोत्सवाचा पहिल्याच दिवशी उडाला बोजवारा
अत्यंत सुरेल मैफलीत रसिकांची वानवा, जिल्हा प्रशासनाचे दळभद्री नियोजन, रसिकांसाठी पर्वणी एमआयडीसीत असल्यामुळे प्रेक्षकांनी फिरविली पाठ

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१६ फेब्रु.
सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पटांगणात आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा आज शुभारंभ दिनीच बोजवारा उडाला. महाराष्ट्रातील दर्जेदार कलाकार असताना केवळ दोनशेच्या आसपास प्रेक्षकांच्या उपस्थितीने कलाकारांची निराशा केली. अत्यंत सुरेल मैफलीत रसिकांची वानवा होती, जिल्हा प्रशासनाचे दळभद्री नियोजन, रसिकांसाठी असलेली पर्वणी मुख्य शहरापासून पाच किलोमीटर दूर एमआयडीसीत असल्यामुळे प्रेक्षकांनी फिरविली. त्यामुळे शासनाचा हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रशासकीय अनास्थेचा बळी ठरला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह याच्या हस्ते दीपप्रज्वल करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, आदी यावेळी उपस्थित होते.
सायंकाळी सहा या नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिरा म्हणजे रात्री ८ वाजता सुरू झालेल्या मैफलीची सुरुवात ‘तुझे गीत गण्यासाठी सूर लावू दे’ या गाण्याने करण्यात आली. विठू माऊली तू माऊली जगाची, का रे दुरावा, मन उधान वाऱ्याचे, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का, येऊ कशी प्रिया, कधी तू अशा विविध गाण्यांची मेजवानी रसिकांना मिळाली. अत्यल्प उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजराने या गाण्यांना दाद दिली.
शनिवारी दंडार, गोंधळ, रेला नृत्य आणि लावणी या लोककलेची पर्वणी. पण रसिक लाभतील काय?
16 ते 20 फेक्रुवारी दरम्यान होत असलेल्या या पाच दिवसीय महोत्सवात गीत, संगीत, नाट्य, हास्यजत्रा आणि झाडीपट्टी नाट्यकलेची रसिकांना मेजवानी अनुभवता येणार आहे. उद्या १७ फेब्रुवारी रोजी दंडार, गोंधळ, रेला नृत्यासचे सादरीकरण झाडीपट्टी गृपचे हरिश्चंद्र बोरकर करणार असून प्रसिद्ध मेघा घाटगे व त्यांचा संच लावणी कार्यक्रम सादर करणार आहेत.
पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे . मात्र किती रसिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील ? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी केले आहे.