दक्षिण गडचिरोलीत धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात यश
दोन शेतकरी महिलांचा घेतला होता बळी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १९ जानेवारी
दक्षिण गडचिरोलीत धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या चमूने १८ जानेवारीरोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ही मोहीम फत्ते केली. त्यामुळे दहशतीत असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या वाघिणीने एकाच आठवड्यात दोन शेतकरी महिलांचा बळी घेतला होता.
गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजपर्यंत उत्तर गडचिरोली भागात असलेले वाघ दक्षिण क्षेत्रात स्थलांतरित होत आहेत. परिणामी त्या भागात मानव वन्यजीव संघर्ष वाढला. यातून ७ आणि १५ जानेवारी रोजी सुषमा देवदास मंडल (५५, रा. चिंतलपेठ), रमाबाई मुंजमकर (५५,रा. कोडसापूर) या दोन महिलांचा शेतात काम करताना वाघिणीच्या हल्ल्यात जीव गेला. त्यामुळे या परिसरात प्रचंड दहशत आणि तीव्र संतापाची लाट होती.
काँग्रेस नेते अजय कंकडालवार व हनमंतू मडावी यांच्या नेतृत्वात वन विभागावर धडक देत नागरिकांनी वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यावरून वनविभागाने १६ जानेवारी रोजी या वाघिणीला पकडण्यासाठी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ ला पाचारण केले होते. दोन दिवस या वाघिणीने चमूला गुंगारा दिला. अखेर १८ जानेवारी रोजी मध्यरात्री तिला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीचे वय अंदाजे अडीच वर्ष असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ने आतापर्यंत जेरबंद केलेल्या वाघांची संख्या ६३ झाली आहे. खोब्रागडे यांच्यासह शूटर अजय मराठे, दिपेश टेंभूर्णे, वसीम शेख, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे आदींनी ही कामगिरी पार पाडली.