आपला जिल्हा

२३ ते २७ पर्यंत गडचिरोलीत जिल्हा कृषि महोत्सवाचे आयोजन

शेतकऱ्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी महोत्सव ठरणार सेतू

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१८ जानेवारी 

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग, माविम, उमेद व नाबाई यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री संकल्पने अंतर्गत २३ ते २७ जानेवारी दरम्यान कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आत्माचे प्रकल्प संचालक पी. एन. धाकडे यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवारी २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता खासदार अशोक नेते यांच्या हस्ते कृषि महोत्सवाचे उद्घाटन होईल. आमदार रामदास आंबटकर कार्यक्रमाची अध्यक्षता करतील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल बासु अतिरीक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील विभागीय कृषि सहसंचालक मिलींद शेंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. बुधवारी खरेदीदार व विक्रेत्यांचे संमेलन, गुरुवारी परिसंवाद, शुक्रवारी रेशीम उद्योगावर कार्यशाळा तर शनिवारी समारोपीय कार्यक्रमात शेतकरी सन्मान समारंभ होईल.

धाकडे यांनी सांगितले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल पडलेल्या किमतीत मध्यस्था मार्फत किंवा व्यापाऱ्यांना विकावा लागतो. तोच माल ग्राहकांना मात्र चढ्या दरात खरेदी करावा लागतो. शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही हित साधण्याच्या दृष्टीने कृषि महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन थेट ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने प्रयोगशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून अन्य शेतकऱ्यांना विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कृषि योजना उपक्रमांची माहिती, विद्यापीठाचे संशोधित तंत्रज्ञान, बाजारपेठ व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय आदी विषयांवर चर्चासत्रे आणि तज्ञांचे व्याख्यान होईल. महोत्सवात धान्य, खाद्यपदार्थ, फळे, फुले, भाजीपाला व सेंद्रीय माल विक्रीसाठी उपलब्ध राहील.

महोत्सवात एकूण २०० दालनांचा समावेश असून गडचिरोलीसह राज्यातील अन्य जिल्हांतील उत्पादित कृषिमाल विक्रीसाठी उपलब्ध असेल, कृषी विद्यापीठे, कृषि संलग्न विभाग, कृषी महामंडळे, बांबू विकास महामंडळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, मत्स्य विकास विभाग, रेशीम विभाग, विविध कृषी महामंडळे, ग्रामोद्योग आदी स्टॉल्स उपलब्ध असतील. जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी महोत्सवाला भेट देऊन विविध विषयांवरील ज्ञान प्राप्त करावे असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक पी. एन. धाकडे यांनी केले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!