संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी महिला सक्षमीकरण अभियान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ९ जानेवारी
महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सक्षम होतो. त्यामुळे संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान सुरु केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाप्रसंगी केले. यावेळी जिल्ह्यात १४९ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या ३० कामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे यांच्यासह जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, पोलिस अधीक्षक नीलोत्पल बासू उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात आता उद्योग येत असून, लवकरच रेल्वे, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. यामुळे आदिवासी , नक्षलप्रभावित, मागास जिल्हा अशी ओळख पुसली जात आहे .शासन आपल्या दारी योजनेतून राज्यातील जवळपास २ कोटी २० लाखांपेक्षा जास्त जणांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच येथे उभारण्यात आलेल्या स्कील सेंटरमधून दरवर्षी ५ हजार तरुण- तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येईल. असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. यापुढच्या काळात देखील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारने १३ कोटी महिलांना उद्योगासाठी कर्ज दिल्याचे सांगून सर्व महिलांच्या हाताला काम मिळेपर्यंत मुख्यमंत्री सशक्तीकरण योजना सुरु राहील, अशी ग्वाही दिली. २०३० पर्यंत गडचिरोली जिल्हा विकसित जिल्हा म्हणून नावारुपास येईल, असा आशावादही फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी विविध योजनांच्या लाभार्थीना साहित्य वाटप करण्यात आले. शिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, खासदार अशोक नेते यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांची माहिती दिली.