कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान मातेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा
शेकापचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१३ डिसेंबर
धानोरा तालुक्यातील मौजा कारवाफा येथील साधना संजय जराते हीचा कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रीयेदरम्यान डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दुबार शस्त्रक्रिया करतांना साधनाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.
आरोग्य मंत्री डॉ.तानाजी जाधव यांच्याकडे केलेल्या तक्रारीत आमदार भाई जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, ८ डिसेंबरला डॉ. धीरज मडावी आणि त्यांच्या पथकाच्या हलगर्जीपणामुळे तब्बेत खालावल्याने साधनावर १० डिसेंबरला शासकीय महिला रूग्णालय,गडचिरोली येथे डॉ. माधुरी किलनाके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा शस्त्रक्रिया करताना साधना जराते या २३ वर्षीय महिलेचा दुदैवी मृत्यु झाला. व त्यांची १ आणि ४ वर्षाची मुले पोरकी झालीत.असे असतांनाही डॉ. माधुरी किलनाके यांनी नातेवाईकांना जवळपास अडीच तास या बाबतची माहिती दिली नाही. तसेच मृत्यूची घटना उघडकीस येवूनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दोषी डॉक्टरांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. गडचिरोली जिल्ह्यात डॉ.दावल साळवे यांच्या कार्यकाळात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अनेक बालमृत्यू आणि मातामृत्यू झाल्याची प्रकरणे झालेली असून त्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बेजबाबदार कार्यपध्दती कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा महिला रूग्णालयाच्या डॉ. माधुरी किलनाके, शस्त्रक्रीया करणारे डॉ. धीरज मडावी यांना शासनाने तडकाफडकी निलंबीत करून त्यांचेवर हत्येचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि मृतक साधना जराते हिच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.