वन्यजीवांच्या हल्यात नागरिकांचे बळी; वनमंत्री, पालकमंत्री आणि वनअधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा
कांग्रेसची गडचिरोली पोलीसांत तक्रार

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २६ नोव्हेंबर
गडचिरोली जिल्ह्यात वाघ,बिबट आणि रानटी हत्तींचा सुळसुळाट झाला असुन शेतकरी शेतमजूर आणि सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. नागरिकांचे बळी जात असून शेतकऱ्यांचे हाती आलेले पीकही रानटी हत्तींकडून नष्ट केले जात आहे. असे असताना वनमंत्र्यांसह वनप्रशासन नुकसान भरपाई वगळताबंदोबस्ताच्या अन्य उपाय योजना करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे वनमंत्री, पालकमंत्री आणि वनअधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा. अशी मागणी करणारी तक्रार गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
शनिवारी मरेगाव येथील युवकास रानटी हत्तीने चिरडले. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला.
धान पीक कापणीवर आले आहे, जिल्ह्यातील अनेक भागात कापणी व मळणीचे काम चालू झाले आहेत त्यामुळे अनेक शेतकरी बांधवाना जास्तीत जास्त वेळ शेतात राहावं लागत आहे, अश्यात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाचेही हल्ले वाढत चालले आहेत. हत्तीकडून हातात आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने नाईलाजास्तव धानाची राखण करावी लागत आहे, मात्र इतक्या दिवसात हत्ती आणि वाघाचे हल्ले वाढत चालले असतानाही वनविभागाकडे अद्यापही अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे नाहीत, जेणे करुन ज्या गावाशेजारी हत्ती असतील त्यांचा शोध घेऊन तेथील शेतकऱ्यांना सतर्क करू शकतील. अश्या ह्या हलगर्जीपणामुळे शेतकरी बांधवाना जीव गमावावा लागत आहे, त्यामुळे वनमंत्री, पालकमंत्री आणि वनअधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे नेतृत्वात कांग्रेसने केली आहे.