शेकडो अंगणवाडी महिलांनी रस्त्यावर उतरून सरकारचा केला निषेध

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२८ फेब्रुवारी
अंगणवाडी महिला आपल्या न्यायसंगत मागण्यांकरीता मागील चार महिण्यापासून सतत संघर्ष करीत आहेत. या चार महिण्याचे काळात महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास सतत आश्वासने दिली. मात्र त्याची पूर्तता केली नाही. याचे निषेधार्थ २० फेब्रुवारी पासून राज्यातील दोन लाख अंगणवाडी महिलांनी बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी महिलांनी गडचिरोली जिल्हापरिषदेसमोर रस्त्यावर उतरून सरकारचा तीव्र निषेध केला.
मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी मानधन वाढ घोषीत करण्याचे आश्वासन दिले होते. नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणी बाल कल्याण मंत्री या त्रिकुटाने २६ जानेवारीला मानधन वाढीची घोषणा करण्यात येईल असे घोषीत केले. परंतु प्रत्यक्षात काहीही झाले नाही. या नेत्यांनी चालाकी करुन वेळ मारुन नेली. याचे निषेधार्थ २० फेब्रुवारी पासून राज्यातील दोन लाख अंगणवाडी महिलांनी बेमुदत संप पुकारला आहे. कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रा. दहीवडे म्हणाले शासनानेच संप करण्यास अंगणवाडी महिलांना भाग पाडले. दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी केली असती तर संप पुकारण्याची वेळ अंगणवाडी महिलांवर आली नसती.राजेश पिंजरकर यांनी सांगितले की सेवानिवृत्त अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीनंतर सेविकेला एक लाख रुपये तर मदतनिसला ७५ हजार रुपये देण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेण्यात आला. झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. अमोल मारकवार, रामदास जराते, जयश्री वेडधा, राजु सातपुते, विठ्ठल प्रधान यांनी देखिल अंगणवाडी महिलांना मार्गदर्शन केले. ललिता केदार यांचे नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकारी यांना भेटले व मागण्याचे निवेदन सादर केले. धरणे कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता, भारती रामटेके, छाया कागदेलवार, सुमन तोकलवार, विठाबाई भट, संगीता वडलाकोंडावार, उर्मीला गव्हारे, सरीता आत्राम, कौशल्या गौरकार, माया नैनुरवार, यांनी विशेष परीश्रम घेतले.