आपला जिल्हा

जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक मार्ग बंद

दोन दिवस रेड अलर्ट जारी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०८ ऑगस्ट

गडचिरोली जिल्ह्यात रविवारपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोर धरला आहे. सोमवारी सकाळपासून आलापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गासह काही महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. तसेच हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला असून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यामध्ये सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मेडीगड्डा बॅरेज सह इतर प्रकल्पामधून पाण्यचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६५.६ मिमी पाऊस पडला असून मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक १५६.४ मिमी पाऊस झाला. तसेच गडचिरोलीत १००.४ मिमी, कुरखेडा २०.३ मिमी, आरमोरी ४२.७ मिमी, चामोर्शी ८६.८ मिमी, सिरोंचा ३६.६ मिमी, अहेरी ५१.४ मिमी, एटापल्ली ११.१ मिमी, धानोरा ६१.४ मिमी, कोरची २५.३ मिमी, देसाईगंज ४२.६ मिमी व भामरागड तालुक्यात ५२ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात १ जून ते आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या १५१.२ टक्के म्हणजेच ११३१.९ मिमी पाऊस झाला आहे.

गेल्या महिन्यात जवळपास ८ जुलै ते २२ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्हावासीयांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला. हळूहळू ही परिस्थिती सावरत असताना पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडाभरात गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतशिवारांमध्ये अंतर्गत मशागतीची कामे वेगात सुरू होती. ही कामे सुरू असताना पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात रविवारपासून पावसाने हजेरी लावली. सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील काही महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. त्यात चांदाबळा-कुंभी, रानमुल-माळेमूल, पोटेगाव-देवापूर, साखरा-कारवाफा, मुलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला असून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व गडचिरोली जिल्ह्यासह नजीकच्या जिल्हयामध्ये सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्प, अप्पर वर्धा प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प, येलंमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज, सरस्वती बॅरेज व मेडीगड्डा बॅरेज यांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहीत करण्यात येत असुन धरणातून विसर्ग पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!