आदिवासी विकास विभागातील ज्वलंत प्रश्नांवर आदिवासी विकासमंत्री निरुत्तर
आश्वासनांपलिकडे काही नाही
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२५ एप्रिल
गडचिरोलीतील आदिवासी विकास विभागात समस्यांचा डोंगर उभा असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना साधे गरम पाणी, विषय शिक्षक गणवेश, पाठ्यपुस्तके कधीही वेळेवर मिळत नाही. आदिवासींच्या अनेक योजनांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे, प्रशासनात सावळा गोंधळ आहे. असे असताना गडचिरोलीतील आदिवासी विकास विभागाची वाटचाल चांगली असून आदिवासींचा पायाभूत विकास हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोक उईके यांनी सांगितले . मात्र त्यानंतर पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्ती वर मंत्री गांगरुन गेले आणि थातुरमातुर उत्तरे आणि भविष्यातील वाटचाल चांगली होईल असे आश्वासन देत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारचे १०० दिवस पूर्ण झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ते शुक्रवारी दिवसभर गडचिरोली जिल्ह्यात होते. आढावा घेतल्यानंतर सायंकाळी ७:३० वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे सह पालकमंत्री एड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम,आदिवासी विकास विभागाच्या विभागिय आयुक्त आयुषी सिंह, जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांचेसह अधिकारी उपस्थित होते. मंत्री म्हणाले की प्रत्येक आश्रमशाळेत वसतीगृहे ही योजना मिशन मोडवर राबविण्यात येणार आहे.
पत्रकारांकडून प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर मंत्री महोदयांनी पत्रकार परिषद आवरती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकारांनी यशस्वी होऊ दिला नाही. त्यानंतर आदिवासी विकास विभागातील धान घोटाळा, गायवाटप घोटाळा, आश्रमशाळेतील विविध समस्या, विकास निधीची इतर विभागांकडे वळती, आदिवासींच्या जमिनी वरील अतिक्रमणे,या वर्षीच्या खरेदी झालेल्या धानाची भरडाई असे अनेक प्रश्न विचारले गेले. परंतु दोषींवर कारवाई करु, माहिती घेऊन सांगतो, लवकरात लवकर समस्यांची दखल घेऊन त्याची सोडवणूक करु. अशी आश्वासनात्मक उत्तरे मंत्री महोदयांनी दिली. पत्रकारांकडून विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री निरुत्तर झाले आणि थातुरमातुर उत्तरे देऊन बोळवण केली. यातून आदिवासी विकास विभागाचे पितळ उघडे पडल्याचे समोर आले आहे.