केंद्रीय चमूने केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०२ ऑगस्ट
जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी सिरोंचा शहरासह अनेक गावात शिरले. यामुळे १० हजाराहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. तर शेती सह घरांचे मोठे नुकसान झाले. केंद्रीय पथकाने मंगळवारी सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट दिली व नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे सूचना जिल्हा प्रशासनाला दिले.
या पथकात अर्थ मंत्रालयातील वित्त विभागाचे उप सचिव रूपक दास तालुकदार, नागपूर कृषी विभागाचे संचालक ए एल वाघमारे, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश होता. केंद्रीय पथकाने सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. तसेच तालुक्यातील आरडा, मुगापूर, मद्दीकुंठा व मृदुकृष्णापूर या गावांतील नागरिकांची भेट घेतली व शेतकऱ्यांसह शेतात जाऊन बांधावर पूरस्थितीची पाहणी केली. व संवाद साधला.
केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विभाग प्रमुखांची संबंधित सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांकडून पूरबाधित नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपविभागीय दंडाधिकारी अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कृष्णा रेड्डी व तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
पूरबाधित क्षेत्रातील ग्रामस्थांशी साधला संवाद
जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा येथील झालेल्या नुकसानीबाबत पथकातील सदस्यांना माहिती दिली. तसेच यावेळी पथकातील सदस्यांनी गावांमधील उपस्थित शेतकरी नागरिकांशी झालेल्या नुकसानी बाबत चर्चा केली. उपस्थित शेतकरी शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना शेती विषयक धारण विषयक तसेच जनावरे जीवित हानी याबाबतची सविस्तर माहिती दिली. पथकाने स्थानिक शेतकऱ्यांसह शेतात जाऊन बांधावर पूरस्थितीची पाहणी केली व गावकऱ्यांना तपासणी अहवाल केंद्राकडे सादर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करू अशी ग्वाही दिली.
जिल्हास्तरावर विभाग प्रमुखांची बैठक
केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संबंधित सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांकडून पूरबाधित नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी झालेल्या नुकसानी बाबतचे सादरीकरण केले तर संबंधित विभागप्रमुखांनी संपूर्ण तपशील केंद्रीय पथकापुढे मांडले.