अस्वलाच्या हल्ल्यात रोवणी करणारा तरुण शेतकरी जखमी
हल्ला परतवून लावताना समयसुचकता दाखवल्याने वाचले प्राण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.३ ऑगस्ट
धान रोवणीच्या कामात व्यस्त असलेल्या तरुणावर अस्वलाने अचानक हल्ला चढविला. यावेळी त्याने एकट्यानेच अस्वलाशी झुंज दिली आणि प्रतिकार करतानाच आरडाओरड केल्याने इतर शेतकरी धावले व त्यांनी अस्वलाच्या तावडीतून त्यास सोडवले. ही घटना धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे गुरुवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
अशोक फरदीया (३७, रा. मुरूमगाव ) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे धान रोवणीची
कामे खोळंबली होती. पावसाने काहीशी ऊघाड दिल्याने आता पुन्हा कामे वेगात सुरु झाली आहेत. अशोक फरदीया हा गुरुवारी स्वत:च्या शेतात धान रोवणी करत होता. यावेळी अस्वलाने अचानक हल्ला चढविला. डोक्यात पंजा मारल्याने मोठी दुखापत झाली. अशोक यांनी सुरुवातीला त्याच्याशी प्रतिकार केला. याचवेळी प्रसंगावधान राखून जोरात आरडाओरड करुन इतर शेतकऱ्यांना बोलावले. त्यानंतर शेतकऱ्यांनी धाव घेत अस्वलाला पिटाळून लावले. उपस्थित शेतकऱ्यांनी जखमी अशोक फरदीया यांना तातडीने धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजभे यांच्या देखरेखीत उपचार सुरु आहेत.
परिसरात हिंस्र प्राण्यांची दहशत
गडचिरोली हा वनव्याप्त जिल्हा आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून वाघ,बिबट, अस्वल आणि नव्यानेच दाखल झालेले जंगली हत्तींच्या कळपांचा धुमाकूळ सुरू आहे. बुधवारी या हत्तींनी कुरखेडा तालुक्यातील आंबेझरी गावात शिरुन धुडगूस घालत १४ घरांची तोडफोड केली. मुरुमगावजवळही घनदाट जंगल आहे. त्यामुळे येथे हिंसक प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. धान रोवणी कामाच्या लगबगीत अशा घटना घडल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा व पिडीत शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक
सहाय्य करावे, अशी मागणी होत आहे