नक्षलग्रस्त भागात जाऊन जनसंघर्ष समितीने केला स्वातंत्र्यदिन साजरा

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १६ ऑगस्ट
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना, जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागामध्ये अजूनही नक्षल्यांच्या भीतीपोटी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. असा भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त पेरमिली व एटापल्ली तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन जन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र दिन साजरा करून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ असा जयघोष करण्यात आला.
जिल्ह्यात १४ ऑगस्ट रात्रोपासून मुसळधार पाऊस सुरु झाला त्यामुळे अनेक मार्ग पूरामुळे बंद झाले. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. जन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील नक्षल प्रभावित पेरमीली येथील दुर्गम आदिवासी भागात तसेच खाणींचे साम्राज्य असलेल्या एटापल्लीतील काही गावांत पोहोचून स्वातंत्र्यदिनोत्सव साजरा केला. यावेळी गाडीला महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या कटआऊट्सने वाहन सजविण्यात आले होते. बिरसा मुंडाचे कटआऊट दिसताच या भागातील आदिवासींच्या मनात उत्साह संचारला होता. येथील नागरिकांना राष्ट्रध्वज आणि मिठाईचे वाटप करण्यात येऊन ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ असा जयघोष केला. यावेळी जन संघर्ष समितीचे दत्ता शिर्के, अभिषेक सावरकर, आशिष चौधरी, सुधांशु ठाकरे, जगदीश वानोडे, शुभम ढोंगले उपस्थित होते.