आठवडाभरानंतर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा
८ ऑगस्ट पर्यंत ' येलो अलर्ट ' जारी ; आलापल्ली ते सिरोंचा महामार्गावरील नाल्यांना पूर

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि ०६ ऑगस्ट
हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत आठवडाभरानंतर गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून ८ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली असून या रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जुलै महिन्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यांना पूर परिस्थितीचा जबर फटका बसला होता. काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने या भागातील पूर परिस्थिती ओसरली. मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरील अनेक नाल्यांना पूर आला आहे.
मागील काही दिवसापासून पावसाने उसंत घेऊन दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची धान रोवणीची कामे पाण्याअभावी खोळंबली होती. तर काही शेतात भेगा पडल्या. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रोवणीच्या कामांना गती मिळणार आहे. हवामान विभागाने ८ ऑगस्ट पर्यंत येलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.