पुराच्या पाण्यात वाहून गेली बैलगाडी, शेतकऱ्यासह बैलांना वाचविण्यात यश
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील घटना

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि १७ जुलै
नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असतानाही शेतीच्या अत्यावश्यक कामांसाठी पुरातून बैलगाडीने जात असताना नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात घडली. या घटनेचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
कोरपना तालुक्यातील नांदा येथील नाल्याला पूर आला असून गेले १० दिवस हा नाला पुराच्या पाण्याने भरुन वाहत आहे. पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात जावे लागते. त्यामुळे, ग्रामस्थांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तर, गेली १५ वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. मात्र, यामार्गे असलेला बारमाही नाला विकासात अडसर ठरलाय.
नांदा येथील गहिनीनाथ वराटे नामक शेतकरी शेतीच्या कामांसाठी बैलगाडी जात होता. नाल्यावर आलेल्या पुलावरून बैलगाडीने वाट काढत असतांना बैलगाडीत असलेल्या दोघांसह बैलगाडी वाहून गेली. नदीच्या काठावर असलेल्या ग्रामस्थांनी धावाधाव करत मदत केल्याने बैलजोडी व गाडीतील दोघांचे प्राण वाचले. मात्र, मोठी कसरत करुन पाण्यात उतरून गावकऱ्यांनी हे जीव वाचवले आहेत. एकीकडे देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहे, मात्र साध्या-साध्या दळणवळणाच्या समस्यांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले आहे.