विद्यापीठाची प्रतिमा खराब होणे हे समाजाला न परवडणारे
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे मत
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १२ मार्च
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम मागास भागातील गरीब, गरजू आणि गुणवान विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेरघर ठरले आहे. अशावेळी विद्यापीठाच्या कार्यप्रणाली बाबत काही माध्यमांतून कपोलकल्पित वावड्या उठविणाऱ्या बाबी उपस्थित करुन विद्यापीठाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून विद्यापीठाची प्रतिमा खराब होत असते. ही बाब समाजाला परवडणारी नाही. त्यामुळे विद्यापीठाशी संबंधित सर्वांनी विद्यापीठाची प्रतिमा उज्ज्वल राखण्याची आवश्यकता आहे. असे मत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. ते विद्यापीठाच्या सभागृहात गडचिरोली येथील माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत होते. यावेळी प्र कुलगुरू डॉ. कावळे, रजिस्ट्रार डॉ. हिरेखण आणि परिक्षा नियंत्रक डॉ. पोटदुखे प्रामुख्याने उपस्थित होते.
समाज माध्यमांमध्ये विद्यापीठाबाबत निराधार बाबी समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. कुलगुरू पुढे म्हणाले की समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षण देणाऱ्या संस्थांचे महत्व अधोरेखित केले आहे. गोंडवाना विद्यापीठाने अल्प कालावधीत उल्लेखनीय प्रगती केली आहे. इ- समर्थ प्रणालीद्वारे परिक्षांचे ऑनलाईन नियंत्रण केले गेले आहे. ही बाब महाराष्ट्रातील काही बोटावर मोजता येईल एवढ्याच विद्यापीठात आहे. मुल्यांकन अत्यंत गोपनीय पद्धतीने केले जाते. एवढेच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनात गुणात बदल होतो अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत केले जाते. ही व्यवस्था केवळ गोंडवाना विद्यापीठातच आहे.
विद्यापीठ हे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदु मानुन प्रगतीच्या मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करीत असताना काही जण हे झारीतील शुक्राचार्य बनू पहात आहेत. मात्र त्यांच्या या इच्छा कधीही पूर्ण होणार नाहीत. प्रस्तावना कुलसचिव डॉ. अनील हिरेखण यांनी तर आभारप्रदर्शन वर्षा कोल्हे यांनी केले.


