
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १७ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस थांबला असला; तरी त्यापूर्वी दोन दिवस संततधार पाऊस कोसळल्याने आणि गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने नदी, नात्यांना पूर आला असून, अजूनही जिल्ह्यातील तब्बल १८ मार्गावरील वाहतूक बंद आहे. पुरामुळे भामरागड येथील ३०, देसाईगंज येथील ५६, वघाळा येथील ३५ गडचिरोली तालुक्यातील पारडी आणि कोटगल येथील ५१ तसेच सिरोंचा तालुक्यातील करजेली येथील ३७ अशा एकूण २४६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २३ दरवाजे अडीच मीटर ने व १० दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून ५ लाख ३२ हजार २६८ क्यूसेक्स विसर्ग केला जात आहे. तर तेलंगणातील मेडिगट्टा धरणाच्या ८५ दरवाजांमधून १० लाख २५ हजार ६०२ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा, इंद्रावती आणि प्राणहिता नद्यांची पाणी पातळी धोका पातळीच्या वर पोहचली आहे. तर गोदावरी नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे.
आरमोरी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यांसह पुरामुळे गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, , देसाईगंज-लाखांदूर, वडसा ब्रम्हपूरी, आष्टी-गोंडपिपरी, आष्टी-आलापल्ली,कुरखेडा-वैरागड, कोरची-भिमपूर बोटेकसा, कोरची-मसेली-बेतकाठी, वैरागड-पातलवाडा, लाहेरी-बिनामुंडा, अहेरी-वट्रा, अहेरी-देवलमरी, भेंडाळा-गणपूर-अनखोडा, खरपुंडी-दिभना-बोदली, चामोर्शी-मार्कंडादेव-हरणघाट, तळोधी आमगाव- रेगडी इत्यादी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.