गडचिरोली – चिमूर लोकसभची उमेवारी भाजपाचे अशोक नेते यांनाच द्या
लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या सर्व तालुकाध्यक्षांची नेतेंच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत एकमुखी मागणी. नेतेंना उमेदवारी न दिल्यास सीट गमावण्याची व्यक्त केली भीती
![](https://purnsatya.in/wp-content/uploads/2024/03/IMG_20240319_124003-780x470.jpg)
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.१९ मार्च
गडचिरोली चिमूर हा भाजपचा बालेकिल्ला असून मागिल पंचेवीस वर्षांपासून विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली त्याची मजबूत बांधणी करण्यात आली असून त्यांच्या १० वर्षांच्या कालावधीत हे क्षेत्र निरंतर विकासाच्या वाटा चोखारत आहे. आणि या लोकसभा निवडणुकीतही खा. अशोक नेते यांच्या विजयाची शत प्रतिशत खात्री आहे. अशा वेळी वरिष्ठ पक्ष संघटनेने गडचिरोली चिमूर लोकसभेची सीट इतर कोणत्याही सहयोगी पक्षाला न देता भाजपलाच द्यावी. त्यातल्या त्यात विद्यमान खासदार अशोक नेते यांनाच द्यावी. अशी एकमुखी मागणी गडचिरोली चिमूर लोकसभेतील भाजपचे सर्व तालूका अध्यक्षांसह सहाही विधानसभा क्षेत्रांतील भाजपच्या जिल्हा आणि प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी अशोक नेते यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेतून केली आहे.
उद्या बुधवार पासून लोकसभेच्या पहील्या टप्प्यातील निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात पहील्या टप्प्यात मतदान होणार आहे. तरीही अंतिम पूर्व दिवसांपर्यंत कांग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांकडून उमेदवार घोषित झालेले नाहीत. परिणामी नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. आज मंगळवारी सायंकाळपर्यंत महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि शिंदे शिवसेना आपापले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर भाजप उद्या बुधवारी अंतिम यादीची घोषणा करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पत्रकार परिषदेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही सीट भाजपच्याच खात्यात यावी अन्यथा नुकसान होऊ शकते असा निर्वाणीचा इशारा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिला आहे. चिमूर येथील भाजपचे प्रदेश सचिव तथा जेष्ठ नेते डॉ. श्याम हटवादे,किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेश भूरसे यांनी पत्रकार परिषदेत निक्षून सांगितले की मागिल ३० वर्षांपासून आम्ही पक्ष संघटनेची बांधणी करीत लोकसभा ते ग्रामपंचायत पर्यंत सत्ता आणली आहे. लोकसभेच्या सर्व बुथची बांधणी केली आहे. निवडणुकीची संपूर्ण रचना तयार आहे. ती इतर कोणत्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी नव्हे तर देशात पून्हा एकदा भाजपची सत्ता आणण्यासाठी आहे. त्यामुळे गडचिरोली चिमूर मध्ये भाजपचा वगळून इतर उपटसुंभ चालणार नाही. असा संदेश आणि संकेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठ पक्ष संघटने पर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.
पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. श्याम हटवादे, रमेश भूरसे, रमेश बारसागडे, रंजना कोडापे, भारत खटी, प्रणय खुणे, दामोदर अरिगेला, अनिल तिडके, विनोद आकनपल्लीवार, लता पुंगाटी, मुक्तेश्वर काटवे, मोहन मदने, नितीन गादेवार, सारंग साळवे यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.