विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवीदानासोबतच अपमान, रुदन, आक्रोश आणि निषेध
विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा पूढे आला नमुना
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ जुलै
गोंडवाना विद्यापीठाच्या बुधवारी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या १० व्या दीक्षांत समारंभात विद्यापीठ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे पदवीदानासोबतच अपमान, रुदन, आक्रोश आणि निषेध पहावयास मिळाला.
राष्ट्रपतींचा कार्यक्रम संपल्यानंतर पदवीदान कार्यक्रमासाठी निमंत्रित गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पाहूण्यांची सरबराई करण्याच्या नादात पदव्याच वितरित केल्या नाहीत. त्यामुळे आपला अपमान झाल्याची भावना अनावर झाल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, कित्येकांनी या अनुचित प्रकाराविरोधात आपला आक्रोश सुरू केला तर विद्यार्थ्यांसह काही सिनेटर्सनी निषेध व्यक्त केला. हा गोंधळ सुरू झाल्याचे लक्षात येताच विद्यापीठ प्रशासनाने उपरती झाल्याप्रमाणे थातूरमातूर पद्धतीने या गुणवंतांना पदव्या वाटल्या.
दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिधी म्हणून भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा. दौप्रदीजी मुर्मू उपस्थित असल्यामुळे त्यांच्या उपस्थितीत पदवी मिळेल या
अपेक्षेने अनेक आचार्य, विशेष गुणवत्ता प्राप्त, गुणवत्ता प्राप्त पदवीधर विद्यार्थी आले होते. पदवीदान समारंभात एकूण ५३ सुर्वणपदक प्राप्त विद्यार्थी तसेच ५० पेक्षा अधिक आचार्य पदवी धारकांना निमंत्रीत करण्यात आले होते. राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉल मूळे ६ विद्यार्थाना मंचावर राष्ट्रपतींच्या हस्ते पदके देण्यात आली . त्यानंतर पाहूण्यांची भाषणे झाल्यानंतर अचानक पदवीदान समारंभ समाप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे मान्यवरांसोबत विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, परिक्षा नियंत्रक, अधिष्ठाता निघून गेलेत. आणि उपस्थित गणमान्य सुद्धा.
ज्या पदव्या देण्यासाठी विद्यापीठाने कोट्यवधी रुपयांचा अवाढव्य खर्च केला तो गुणवंतांचा अपमान करण्यासाठी केला काय? असा प्रश्न सिनेट सदस्या प्रा. दिलीप चौधरी प्रा. दिपक घोपरे, प्रा. निलेश बोलखेड , प्रा. प्रवीण जोगी, माजी सिनेट सदस्य डॉ. प्रमोद शंभरकर यांनी विचारला असून झालेल्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करुन आगामी सिनेटच्या बैठकीत जाब विचारला जाईल असे म्हटले आहे.