ध्यास घेतल्याशिवाय यश मिळत नाही – महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. ५ जुलै
देशभरात आपण पाहतो आहे की आदिवासी विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ इच्छित आहेत. त्यांना विकासाच्या संधी देण्याच प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारांकडून केला जात आहे. त्यासाठी विद्यापीठांची निर्मिती केली जात आहे. गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील युवकांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचं सोनं करुन यश खेचून आणायला शिक्षणाचा ध्यास घ्या. कारण ध्यास घेतल्याशिवाय यश मिळत नाही. असे प्रतिपादन महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. त्या बुधवारी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभाच्या मुख्य अतिथी म्हणून बीजभाषण करताना बोलत होत्या.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री विजय गावित, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपती पूढे म्हणाल्या की महाराष्ट्रातील त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आदिवासी बहुल भागातील विद्यापीठात होत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गोंडवाना विद्यापीठात मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी ४१% असून त्यातील ६१% मुलींनी प्राविण्य मिळवले आहे ही अधोरेखीत करणारी बाब आहे. महिला सशक्तीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. विद्यापीठ हे शाश्वत जीवनोन्नती करणारे साधन आहे. गोंडवाना विद्यापीठातून आदिवासींची संस्कृती व परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आश्वासक शिक्षण मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे.
या प्रसंगी लोकेश हलामी,सदाफ नफीस अहमद अन्सारी, अर्पिता ठोंबरे, अमित गोहने, प्रकाश शिंदे आणि सारिका मंथनवार या सहा सुवर्णपदक विजेत्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समारंभात अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता.