कार्पोरेट डेमोक्रॅसी सर्व राष्ट्रीय आजारांचे मुळ ; जल, जंगल, जमीनीला अक्षुण्ण ठेवणे हाच यावरील इलाज
रमण मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलपुरूष प्रो. डॉ. राजेंद्रसिंह यांचे वक्तव्य
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२० जून
सद्यस्थितीत देशात पिपल्स डेमोक्रॅसी राहिली नाही. त्याची जागा कॉर्पोरेट डेमोक्रॅसीने घेतली आणि ही कॉर्पोरेट डेमोक्रॅसी देशाच्या सर्व आजारांचे मूळ आहे. ही लोकशाही ग्लोबल आर्थिक विकासाच्या गोंडस नावाखाली शोषण करते. परंतु निसर्गाच्या शोषणातून कोणताही देश जगातील ताकदवान देश होऊ शकत नाही. या कॉर्पोरेट डेमोक्रॅसी नावाच्या आजारावर, आपल्या जल जंगल जमीनीला अक्षुण्ण ठेवणे हाच एकमात्र इलाज आहे. असे प्रतिपादन रमण मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलपुरूष प्रो. डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले ते चला जाणून घेऊ या नदीला या गडचिरोली जिल्ह्यातील संवादयात्रेच्या आढावा आणि समारोपीय कार्यक्रमासाठी गडचिरोलीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले की जल, जंगल आणि जमीन याशिवाय जीवन विकास शक्य नाही. या सगळ्यांना अक्षुण ठेवण्यासाठी सरकारी, असरकारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन जबाबदारीने काम करण्याची गरज लक्षात घेता चला जाणून घेऊ या नदीला हे अभियान सुरू केले आहे. ते राष्ट्रव्यापी जनआंदोलन व्हावे यासाठी प्रयत्न चालविला आहे. नद्यांचा मुळ आजार काय आहे, त्यांना आजारी करणारे कोण आहेत, नद्यांचे पाणी कुठे गेले, ते पाणी कसे आहे? या सगळ्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे.
अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण हे नद्यांची दुर्दशा होण्याचे तीन प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी लोकजागरण यासारखा दुसरा चांगला पर्याय होऊ शकत नाही. नद्यांसोबत लोकांना जोडले तर हा या शतकातील सर्वात मोठा कार्यक्रम होईल. असेही ते म्हणाले.दरम्यान त्यांनी गोंडवाना विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठाने सुद्ध या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले. बुधवारी सकाळी ११.३० वाजता गडचिरोली जिल्ह्यातील संवाद यात्रेचा समारोपीय कार्यक्रम संपन्न होणार आहे.यावेळी नरेंद्र चुग, प्रवीण महाजन, सुमंत पांडे, रमाकांत कुलकर्णी, प्रदीप राणे, गडचिरोली जिल्ह्यातील नदी प्रहरी प्रकाश अर्जूनवार, मनोहर हेपट, डॉ. गोगुलवार राहुल गुळघाणे, केशव गुर्नूले आणि अन्य नदी प्रहरी उपस्थित होते.
अमृताचा त्रिवेणी संगम साकारण्यासाठी ‘ चला जाणून घेऊ या नदीला
ब्रिटीशांची गुलामगिरी झुगारून मिळालेल्या स्वातंत्र्याचा पहिला अमृतानंद घेतला, संविधानाच्या स्वरुपात लोकशाही व्यवस्था मिळाल्याचा दुसरा अमृतानंद घेतला आणि आता नद्यांना अमृतवाहिनी करून राष्ट्रीय जलभंडारणाचा तिसरा अमृतानंद देऊन अमृताचा त्रिवेणी संगम साकारण्यासाठी ‘ चला जाणून घेऊ या नदीला’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत आहे .रमण मेगसेसे पुरस्कार प्राप्त जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह