बहुजनविचार हा राजकारणातील सक्षम पर्याय ठरू शकतो
शेकाप कार्यालयाला भेटीदरम्यान बीआरएसपी चे अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केले मत

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि.२९ जानेवारी
भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक, जातीयवादी जनविरोधी धोरणांना शह देण्यासाठी बहुजनविचार हा राजकारणातील सक्षम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे स्पष्ट वैचारीक भूमिका असणाऱ्या पक्षांची आघाडी असणे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणे गरजेचे असल्याचे मत बीआरएसपी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केले.
बिआरएसपीच्या कार्यकर्ता बैठकीनिमित्य ॲड. सुरेश माने गडचिरोलीत आले होते. यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यादरम्यान चर्चा करतांना ते म्हणाले की, देशातील लोक भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि जातीयवादी अजेंड्याला कंटाळले आहेत. अशावेळी प्रमुख विरोधी पक्ष काॅंग्रेसने सर्वांना एकत्र घेवून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. तसे झाले नाही तर किमान प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील बहुजनवादी विचारांच्या पक्षांनी स्पष्ट भूमिका घेवून निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावरील बांधणीचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई रामदास जराते यांनी ॲड.सुरेश माने यांचे शेकापच्या वतीने स्वागत केले. यावेळी बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष ॲड. विशेष फुटाणे, प्रदेश सचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्री जराते, दिक्षा रामटेके, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.