सिरोंचा तालुक्यातील पूरपिडीत धडकले तहसील कार्यालयावर
विविध मागण्यासांठी पूरपीडितांचे आमरण उपोषण

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि २३ ऑगस्ट
तेलंगाना येथील मेडीगट्टा प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसत असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गाव रस्त्यावर आले आहेत. असा गावांना शासकीय जागेवर स्थलांतरीत करण्यात यावे, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी सिरोंचा तालुक्यातील पूरपिडीतांनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असून तसे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
मेडीगड्डा प्रकल्प अंतर्गत भूसंपादनासाठी मंजूरी झालेल्या शेत जमिनी तत्काळ भूसंपादन करण्यात यावे, अंकसा, आसरअल्ली व इतर गावातील जमिनीचे सर्वे करून भूसंपादन करण्यात यावे, पिडीत शेतकऱ्यांना प्रकल्प ग्रस्त म्हणून घोषित करून प्रमाणपत्र देण्यात यावे, मेडीगड्डा प्रकल्पामुळे रस्त्यावर आलेल्या गावांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी, यांसह विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या.
निवेदनात म्हटले आहे की, मेडीगट्टा प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे मागील तीन वर्षापासून सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांना वारंवार पुराचा फटका बसला असून सोमनूर, गुम्मलकोंडा, सोमनपल्ली, मुक्कीडीगुट्टा, मुत्तापूर, टेकडामोटला, सुंकरअल्ली, आसरअल्ली, गोल्लागुडम, बोर्र्गुडम, जंगलपल्ली, बालमुत्यामपल्ली, अंकिसा लक्ष्मीदेवीपेठा, कंबालेपठा चिंतारेवुला, कोटापल्ली, पोचमपल्ली, रंगधामपेठा, गंजीरामपल्ली, नडिकुडा व इतर गावातील हजारो हेक्टर शेत जमिन वाहून त्याचे नदीमध्ये रूपांतर झाले आहे. तर काही लोक भूमीहीन झाले व काही लोक भुमिहीन होण्याचा मार्गावर आहेत. आरडा माल, मुगापूर, मृदूक्रिष्णापू, जानमपल्ली,मद्धिकुंठा, चितलपल्ली, नगरम, रामक्रिष्णापूर, सिरोंचा रे, सिरोंचा माल, कारसपल्ली व इतर गावातील शेतजमिन भुसंपादनासाठी मंजूर झाले असले तरी अद्याप भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. मात्र प्रकल्पाचा बँक वाटरचा फटका नेहमी बसत असल्याने शेतकऱ्यांना उपासमारीची पाळी निर्माण झालेला आहे. यावर्षी आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली. झोपड्या बांधून महामार्गावर वास्तव्य करीत आहेत. मात्र सरकारचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. त्यामुळे सिरोचा तालुक्यातील पूरपिडीतांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला असून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असे निवेदन सिरोंचाचे तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी संजय मीणा यांना देण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने पीडित सहभागी झाले आहेत.