गडचिरोलीत तीन दिवसांपासून पाऊस; गोसीखुर्दचे दरवाजे उघडल्याने वैनगंगेला पुर; १९९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १६ सप्टेंबर
गडचिरोली जिल्ह्यासह गोसीखुर्द धरण क्षेत्रातील विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत आहे. छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली- आरमोरी व गडचिरोली- चामोर्शी, साखरा – चुरचुरा, वसा- चुरमुरा, वटरा खूर्द ते आवलमरी या पाच मार्गांवरील वाहतूक शनिवार सकाळपासून ठप्प झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वडसा तालुक्यातील सावंगी येथील १४ कुटूंबातील ५३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर वडसा (देसाईगंज) शहरातील हनुमान वार्डातील १६ परिवारातील ६७ नागरिक आणि गडचिरोली तालुक्यातील कोटगल,पारडी आणि शिवणी या तीन गावातील ७९ अशा एकुण १९९ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे अडीच मीटरने, तर ११ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून १७ हजार ३५ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गडचिरोली नजीकच्या पाल नदीला पूर आला असून, गडचिरोली-आरमोरी मार्ग बंद आहे. शिवाय शिवणी आणि गोविंदपूर नाल्यांनाही पूर आल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.