आपला जिल्हा

अवघ्या सात वर्षातच गोदावरी नदीवरील पुलाची एक कडा गेली वाहून

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि १६ जुलै

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील भव्य पुलाची एक कडा (एप्रोच रोड) पुराच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. सात वर्षांपूर्वीच या पुलाची निर्मिती झाली होती, हे विशेष!

तेलंगणातील जलप्रकल्पांमधून गोदावरी नदीत सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे आणि गोदावरीला येऊन मिळणाऱ्या विविध नद्यांच्या पुरामुळे गोदावरीची पाणी पातळी कमालीची वाढली आहे. याच नदीवर काही अंतरावर असलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाची सर्व ८५ गेट उघडून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीतील पाण्याच्या प्रवाहाला वेग आहे. यामुळेच पुलाची सिरोंचाकडील कडा गुरुवारी रात्री वाहून गेली.

सिरोंचाकडून तेलंगणाच्या हद्दीत येणाऱ्या कालेश्वरम् हे प्रसिद्ध शिव मंदिर असणाऱ्या शहराकडे जाणऱ्या मार्गावर या पुलाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे तेलंगणा-महाराष्ट्र दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. ती आता ठप्प झाली आहे.

प्राणहिता आणि गोदावरी नदीच्या काठावर सिरोंचा तालुक्यात अनेक गावे येत असून पुराच्या पाण्याचा फटका सिरोंचा तालुक्यातील ३४ गावांना बसला आहे. आतापर्यंत १० हजार ५७३ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

अवघ्या सात वर्षात ही अवस्था।

गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने हा पूल मंजूर करण्यात आला होता. गोदावरी नदीच्या पात्रावर १६२० मीटर लांबीच्या या पुलासाठी २४२ कोटी रुपयांचा खर्च झाला. हैदराबाद येथील कंपनीकडून या पुलाची उभारणी झाल्यानंतर २०१५ मध्ये तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण झाले होते. मात्र, अवघ्या सात वर्षात पुलाचा अॅप्रोच रोड वाहून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!