गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षा व मुल्यमापन मंडळाकडून गुणांकनामध्ये गोंधळ ; ४२ ते ४५ गुण प्राप्त विद्यार्थ्यांना केले नापास
परिक्षा व मुल्यमापन मंडळाची विशेष चौकशी करण्याची मानव अधिकार संरक्षण मंच व नेचर फाउंडेशनची मागणी
पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली दि. १९ जुलै
गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी शाखेच्या सेमेस्टर च्या जाहिर करण्यात आलेल्या निकालामध्ये शेकडो विद्यार्थ्यांना इंग्रजी, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी, झूआलॉजी, केमिस्ट्री व इतर विषयामध्ये शून्य, एक ,दोन ,तीन, पाच ,असे गुण देण्यात आले. एवढेच नव्हे तर मिलीटरी सायन्स, समाजशास्त्र विषयात ४२ आणि ४५ गुण असून सुद्धा निकाल नापास म्हणून देण्यात आला. जे विद्यार्थी प्रॅक्टीकल ला उपस्थित होते आणि व्हायवा ला सुद्धा उपस्थित होते यांना सुद्धा नापास करण्यात आले. विद्यापीठात दरवर्षी प्रत्येक सेमिस्टर ला असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे परिक्षा व मुल्यमापन मंडळाचीच विशेष चौकशी करण्यात यावी. अशी मागणी मानव अधिकार संरक्षण मंच व नेचर फाउंडेशन नागपूर चे सचिव निलेश ननावरे यांनी विद्यापीठाकडे केली आहे.
त्यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन विभागाकडून दरवर्षीच गुणांकनामध्ये गोंधळ उडतो आणि विद्यार्थ्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. पूनर्मुल्यांकनाचे शुल्क प्रती विषय ५००रु. एवढे भरमसाठ असल्यामुळे कित्येकदा विद्यार्थी ते भरु शकत नाही. परिणामी त्यांना ऊच्च शिक्षणापासून वंचित व्हावे लागते. त्यामुळे विद्यापीठाने परिक्षा व मुल्यमापन मंडळांच्या गुणांकन प्रक्रियेत सुधारणा करावी आणि विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवावे अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांचेकडे पाठवल्या आहेत.
लेखी आणि प्रात्यक्षिक विषयाचे निकष गांभीर्याने न घेतल्याचा परिणाम
लेखी आणि प्रात्यक्षिक विषयाचे निकष वेगवेगळे आहेत. विज्ञान आणि समकक्ष विषयांत लेखी परीक्षेचे भाग १ व भाग दोन असे पेपर असतात. या १२० गुणांच्या दोन पेपर्स मध्ये पास होण्यासाठी एकुण ४८ गुण लागतात. तर प्रात्यक्षिक परीक्षेत ३० पैकी किमान १२ गुण आवश्यक आहेत. आणि एकूण विषयात १५० पैकी किमान ६० गुण आवश्यक आहेत. यातही लेखी परीक्षेत १२० पैकी ६० गुण प्राप्त झाले आणि प्रात्यक्षिक परीक्षेत जर १२ पेक्षा कमी गुण असतील तरी विद्यार्थी नापास होऊ शकतो. परंतु विज्ञान आणि समकक्ष विषय वगळता विना प्रात्यक्षिक विषयातही जर यशस्वी विद्यार्थ्यांना नापास दाखविले असल्यास विद्यार्थ्यांच्या तक्रारीवर त्याची चौकशी केली जाईल. आणि नुकसान टाळले जाईल.
दिनेश नरोटे, सहाय्यक कुलसचिव, परिक्षा व मुल्यमापन मंडळ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली