दिल्लीतील जंतरमंतर वरील आंदोलनाच्या समर्थनार्थ गडचिरोलीत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून धरणे देत केली धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

पूर्णसत्य न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २० जुलै
दिल्लीतील जंतरमंतरवर काक्रोच जनता पार्टीचे वतीने नीट पेपर लीक प्रकरणावरून सरकारचा घेराव करीत सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ गडचिरोलीत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी आझाद समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली गांधी चौकात रस्त्यावर उतरून धरणे देत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.
दुपारी ३ वाजता पासून सुरू झालेल्या धरणे आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सोनम वांगचूक, अभिजीत दिपके यांचे पोस्टर झळकवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान विद्यार्थ्यांनी ‘आवाज दाबला तरी सत्य थांबत नाही’, ‘आवाज उठेगा, बदलाव आयेगा’ अशा घोषणाही दिल्या. ‘नीट’ पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी काही विद्यार्थी आणि युवतींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर जोरदार टीका करीत आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

धरणे प्रदर्शनात आजाद समाज पार्टी जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे, मार्क्सवादी कॉम्युनिष्ट पक्षाचे सचिव कॉ. अमोल मारकवार, वंचित आघाडी नेते बाळू टेम्भूर्णे, जीं के बारसिंगे, शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हाध्यक्ष पवन गेडाम, धर्मानंद मेश्राम, विवेक खोब्रागडे, आदिवासी विकास युवा परिषद जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे, शीतल नरवडे, प्रा. अनिल होळी, प्रतीक डांगे, संतोषी सूत्रपवार, सतीश कुसराम, प्रितेश अंबादे, सोनाशी लभाने, गणेश वरखडे, दिवाकर साखरे, प्रकाश बन्सोड, नितीन वेस्कडे, विश्वरत्न युथ फॉउंडेशन चे वृषभ रामटेके, साहिल बोदेले, यांचे सह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.


